तामिळनाडूत कोसळणा-या मुसळधार पावसाने राज्याची वाताहत लागली असून राजधानी चेन्नई पाण्याखाली गेली आहे. या पावसाने १०० वर्षाची उच्चांकी पातळी गाठली असून रस्ते, रेल्वे उद्ध्वस्त झाले आहेत. या नैसर्गिक आपत्तीत १९२ जणांचे बळी गेले आहेत.
शहरातील विमानतळ पाण्याखाली गेला असून तो ६ डिसेंबपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. हजारो नागरिक बेघर झाले आहेत. लष्कर, नौदल आणि एनडीआरएफने बचावकार्य सुरू केले असून अडकलेल्या लोकांना अन्नाची पाकिटे वाटण्यात येत आहेत. दरम्यान, येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा केंद्रीय हवामान खात्याचे महासंचालक एल. एस. राठोड यांनी दिला.
शहरात दोन दिवसांपासून तुफान पाऊस पडत असून पुराचे साम्राज्य पसरले आहे. गेल्या २४ तासांत शहरात ४७ सेंटीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. वीजपुरवठा व मोबाईल सेवाही बंद झाली आहे.
रस्ते, रेल्वे आणि हवाई वाहतूक संपूर्ण बंद पडली असून चेन्नई विमानतळावर शेकडो प्रवासी व नागरिक अडकून पडले आहेत. त्यांना सुखरूप बाहेर काढण्याचे काम लष्कर, नौदल आणि एनडीआरएफचे जवान करत आहेत.
मोबाईल, वीज, एटीएम बंद
तुफान पावसामुळे मोबाईल व लँडलाईन दोन्ही संपर्क यंत्रणा बंद पडल्या होत्या. त्यामुळे लोकांना एकमेकांशी संपर्क साधणे अशक्य झाले आहे. अनेक ठिकाणी तर एटीएमही बंद पडले.
मदतीची खासदारांची मागणी
लोकसभेत चेन्नईतील पावसाच्या मुद्यावर तामिळनाडूच्या खासदारांनी सरकारने राज्याला जास्तीत जास्त मदत द्यावी, अशी मागणी केली.
तामिळनाडूला जास्तीत जास्त मदत द्या : राहुल गांधी
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चेन्नईतील तुफानी पावसामुळे राज्याच्या झालेल्या हानीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली. तेथे तातडीने मदत व बचाव कार्य सुरु केले पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.