तामिळनाडूतील पावसाचा तडाखा अद्यापही कमी झाला नसून संपूर्ण राज्यात पावासमुळे आत्तापर्यंत १८९ लोकांचा मृत्यू झाला आहे. बंगालच्या खाडीतील नैऋत्य भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने चेन्नईसह तामिळनाडूच्या इतर भागातही पावसाचा जोर अद्याप कायम असून संपूर्ण चेन्नई शहर पाण्याखाली गेले आहे. मुसळधार पावसामुळे रेल्वे, रस्ते व विमान वाहतुकीलाही फटका बसला आहे. दरम्यान पूरग्रस्तांच्या मदतीसाठी पोलिस, अग्निशामक दल, राष्ट्रीय व राज्य आपत्कालीन दल व तटरक्षक दल सज्ज ठेवण्यात आले आहे.
दरम्यान पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असून पावसामुळे चेन्नईतील अनेक घरात पाणी शिरले आहे. शहारतील शाळा बंद ठेवण्यात आल्या असून परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून कोसळणा-या पावसाचा फटका विमानसेवेलाही बसला असून धावपट्टीवर भरपूर पाणी साचल्याने चेन्नई विमानतळ दिवसभरासाठी बंद करण्यात आले असून सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
दरम्यान मुख्यमंत्री जयललिता यांनी पूरग्रस्त भागाचा आढावा घेतला असून पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांची नियुक्ती केली आहे.