दूषित पाण्यामुळे गोराईतील रहिवाशांच्या आरोग्याला धोका

दूषित पाण्यामुळे गोराईतील रहिवाशांच्या आरोग्याला धोका

मालाड कुरार व्हिलेजमधील दूषित पाण्यामुळे लहान मुलाचा बळी गेल्याची घटना ताजी असताना गोराई २ मधील सुमारे १४ सोसायटींमधील पाचशेहून अधिक कुटुंबे गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे हैराण आहेत. मागील काही दिवसांपासून या भागात होत असलेल्या दूषित पाण्यामुळे येथील रहिवासी उलटय़ा व जुलाबामुळे त्रस्त आहेत. याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर प्रत्येक सोसायटीतील पाण्याचे नमुने गोळा करून महापालिकेच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. मात्र महापालिकेकडून कोणत्याही प्रकारची उपाययोजना राबवली जात नाही.

बोरिवली पश्चिम येथील गोराई-२मध्ये क्षमसाफल्य देवगिरी या सोसायटीसह तब्बल १४ सोसायटींमध्ये दूषित आणि घाणेरडे पाणी येत आहे. या दूषित पाण्याचा पुरवठा केवळ एका सोसायटीत होत नसून या परिसरातील सर्वच सोसायटीत होत आहे. या दूषित पाण्यामुळे या सर्व सोसायटीत उलटी व जुलाबामुळे रहिवासी त्रस्त आहेत. अतिसार (गॅस्ट्रो) या आजाराचे प्रमाण वाढू लागले आहे.

त्यामुळे विभागात होत असलेला दूषित पाणीपुरवठा आणि गॅस्ट्रोचे वाढते रुग्ण याच्या तक्रारी येत असल्यामुळे स्थानिक नगरसेवक शिवानंद (शिवा) शेट्टी यांनी विभागातील सर्व सोसायटीतील पाण्याची माहिती घेत नमुने गोळा केले. यामध्ये सर्वच सोसायटीत दरुगधीयुक्त पाणी येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महापालिकेच्या जलअभियंता विभागाच्या अधिका-यांच्या ही बाब लक्षात आणून दिली. दूषित पाण्याची समस्या ही गंभीर असून जलअभियंता विभागाने दूषित पाण्याची कारणे शोधून त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधितांना दिले आहेत. मात्र अद्यापही कोणत्याही उपाययोजना जल विभागाकडून करण्यात आल्या नसून दूषित पाण्यामुळे रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

का होतोय दूषित पाण्याचा पुरवठा

गोराई-२ला पाण्याचा पुरवठा करणारी जलवाहिनी ३० वर्षे जुनी झाली असून जीर्ण झाली आहे. गोराईचा भाग समुद्र, खाडी विभागात असल्यामुळे खा-या वातावरणामुळे येथील जलवाहिनी लवकरच खराब झालेली आहे. त्यामुळे जीर्ण झालेल्या जलवाहिनीत खाडीचे अथवा अन्य पाणी मिसळत असल्याने दरुगधीयुक्त पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जलवाहिनी बदलण्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी जुनी व जीर्ण झाल्यामुळे त्यातून पाण्याची गळती होऊन पाणी वाहून जात आहे. तसेच अनेक ठिकाणी जीर्ण झाल्यामुळे यात खाडीचे पाणी शिरून पाणी दूषित होत आहे. त्यामुळे ही जलवाहिनी बदलली जावी यासाठी मागील दोन वर्षापासून प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मात्र वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन जलवाहिनी बदलण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप काँग्रेसचे स्थानिक नगरसेवक शिवानंद शेट्टी यांनी केला. दूषित पाण्याची समस्या दूर करण्यासाठी आधी गळती शोधून ती दुरुस्त करावी आणि जलवाहिनी बदलण्यासाठीही कार्यवाही करावी, अशी मागणी प्रशासनाकडे केल्याचे शेट्टी यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *