कोपर आणि दिवादरम्यान लोकलमधून पडून भावेश नकाते याच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर लोकलच्या गर्दीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. केवळ १२०० प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असलेल्या लोकल ट्रेनमध्ये सकाळी आणि संध्याकाळी ऐन गर्दीच्या वेळी तब्बल ७ ते ८ हजार प्रवासी किडया-मुंग्यांप्रमाणे कोंबले जातात. त्यामुळे अपघाताच्या घटना घडतच राहणार, असे मत रेल्वेचे जाणकार, तज्ज्ञ आणि रेल्वे संघटनांचे पदाधिकारी व्यक्त करीत आहेत.
रेल्वेच्या रखडलेल्या कामांमुळे लोकलच्या फे-या वाढवणे शक्य नसल्याने प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. गेल्या वर्षभरात तब्बल ६९७ प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याचे उघड झाले आहे. रखडलेल्या एमयूटीपी-२ मधील प्रकल्प मार्गी लावण्यासाठी रेल्वेला किमान चार वर्षाचा कालावधी लागू शकतो. तर तत्त्वता मान्यता मिळालेल्या एमयूटीपी-३ प्रकल्पातील कामे मार्गी लावण्यासाठी आणखी सात ते आठ वर्षांचा कालावधी जाण्याची शक्यता आहे.
येत्या काळात देखील अपघातांचा आकडा कमी होण्याची शक्यता धूसर असल्याचे स्पष्ट झाले आहे.याशिवाय, अनेक रेल्वे स्थानकांत प्रवासी सुविधांचा मोठया प्रमाणात अभाव आढळतो. अनेक स्थानकांत पिण्याच्या पाण्याची सुविधा देखील उपलब्ध नसते.
लोकल अपघातात हात गमावलेल्या मोनिका मोरे अपघात प्रकरणानंतर फलाटांची उंची वाढवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने देऊन देखील हे काम अद्याप कासव गतीने सुरू आहे. यामुळे वर्षभरात जवळपास ३० प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. तर २००५ ते २०१४ या कालावधीत फलाट आणि लोकलच्या अंतरामुळे तब्बल ६१५५ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.
दरम्यान, मुंबई उपनगरात रेल्वेची मोठया प्रमाणात कामे सुरू आहेत. त्यामुळे येत्या काळात लोकल १५ डब्यांच्या धावणे शक्य आहे. त्यानंतर वाढत्या गर्दीवर रेल्वेला नियंत्रण मिळवणे शक्य होईल, असे मुंबई रेल्वे विकास मंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक पी.सी. सेहगल यांनी सांगितले.
होणा-या अपघातांच्या पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी स्वत: याकडे लक्ष द्यायला हवे. प्रभू मुंबईकर असल्याने त्यांना प्रवाशांना होणा-या अडचणींचा जाणीव आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करून रखडलेले प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आदेश द्यायला हवेत.