दक्षिण आफ्रिकेविरोधातील तिस-या कसोटीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणा-या भारताने सावध सुरूवात करत १२ षटकांत बिनबाद ४८ धावा केल्या आहेत. शिखर धवन (११) व मुरली विजय (३४) खेळत असून हा सामना जिंकून मालिकाही खिशात टाकण्याचा भारताचा निर्धार आहे.
कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या दक्षिण आफ्रिका संघाविरुद्ध भारतीय संघाने मोहाली येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत विजय मिळविल्यानंतर बंगलोर येथे दुसरा कसोटी सामना पावसामुळे अनिर्णीत संपला. मोहालीमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात यजमान संघाने तीन दिवसांत विजय मिळवला तर बंगलोरमध्ये पहिल्या दिवसानंतर पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ शक्य झाला नाही. त्यामुळे आफ्रिकेसाठी हा तिसरा सामना करो वा मरो असा असून भारतीय संघही दुस-या विजयासाठी उत्सुक आहे. भारतीय संघाची भिस्त फलंदाजीमध्ये चेतेश्वर पुजारा, कर्णधार कोहली, मुरली विजय व शिखर धवन यांच्या कामगिरीवर अवलंबून आहे.