दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात वाहतूक मार्गात मोठे बदल ; उत्सवानिमित्त ठाणेकरांवर असणार ड्रोनच्या नजरा

दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे वाहतूक शाखेने शनिवार, ५ सप्टेंबर रोजी शहरात वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. सकाळी सात ते रात्री ११ वाजेपर्यंत विविध रस्त्यांवर वाहतुकीसाठी निर्बंध असून नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित

टेंभी नाका, टॉवर नाका, ब्राह्मण सभा हॉल परिसर तसेच स्टेशन रोड येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुसार या मार्गांवर प्रवेश बंद करून वाहनांसाठी पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.

असे आहेत वाहतूक बदल

जेल तलावासमोर मुख्य पोस्ट कार्यालयाकडून कोर्ट नाका मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना जी.पी.ओ. येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी ठाणे मध्यवर्ती कारागृहाकडून क्रीक नाका मार्गे दादोजी कोंडदेव स्टेडियमकडून उजवे वळण घेऊन पुढे डावे वळण घेऊन ए वन फर्निचर मार्गे वाहने इच्छित स्थळी जातील.

कळवा ते साकेत मार्गात बदल

कळवा व साकेत मार्गे ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना उर्जिता हॉटेलसमोर प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने क्रीक नाकामार्गे डावे वळण घेऊन दादोजी कोंडदेव स्टेडियमकडे उजवे वळुन ‘ए वन फर्निचर’ मार्गे इच्छित स्थळी जातील.

मुस चौक येथे प्रवेश बंद

ठाणे स्थानकाकडून टॉवर नाका व टेंभी नाका परिसराकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना मुस चौक येथे प्रवेश बंद असेल. परिवहनच्या एसटी व टीएमटी बसना बी कॅबिन, सॅटीस ब्रिजमार्गे गोखले रोडने इच्छितस्थळी जाता येईल. रिक्षा व लहान चारचाकी वाहने सॅटीस ब्रिजखालून ठाणे स्टेशन रोड मार्गे मुस चौक मार्गे डावे वळण घेऊन इच्छितस्थळी जातील.

उत्सवातील गर्दीवर ‘ड्रोन’ची नजर

यंदा ठाणे पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत १,३५७ दहीहंड्या फुटणार आहेत. ठाणे शहरात सर्वाधिक हंड्या असून, हा उत्सव निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी ठाणे पोलिसांचा सर्वत्र तगडा बंदोबस्त असणार आहे. पोलिस अधिकारी आणि कर्मचारी मिळून सुमारे ३,३०० पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे. त्याचबरोबर गर्दीवर पोलिस ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवणार आहेत.

पोलिसांचा कडोकोट बंदोबस्त

ठाण्यात दरवर्षी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून, अनेक सेलिब्रिटीही या उत्सवादरम्यान हजेरी लावतात. शनिवार, ५ सप्टेंबरला गोपाळकाला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे, भिवंडी, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगरमध्ये अनेक दहीहंड्या फुटणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *