मध्य रेल्वेवरील (Central Railway) प्रवाशांचा प्रवास आता आणखी जलद होणार आहे. कारण ठाणे-दिवादरम्यानची पाचवी आणि सहावी मार्गिका आजपासून सुरू होत आहे. सोमवारी मध्यरात्रीपर्यंत 72 तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आल्यानंतर आता ही सेवा सुरळीत होत आहे.
सीएसएमटीवरून सुटणाऱ्या आणि त्या दिशेने जाणाऱ्या जलद लोकल, मेल, एक्स्प्रेस गाडयांना ठाणे ते दिवादरम्यान स्वतंत्र मार्गिका उपलब्ध नसल्याने वेळापत्रक विस्कळीत होत होते. लोकल, लांब पल्ल्यांच्या गाडयांच्या वेगावर नियंत्रण येत होते. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत होता. मात्र आता हा प्रवास विनाअडथळा होणार आहे. मध्य रेल्वेचे वेळापत्रक या मार्गिकांमुळे सुधारणार आहे.
ठाणे-दिवादरम्यान पाचवी-सहावी मार्गिका सुरु होणार असल्याने मध्य रेल्वेवरील लोकल प्रवास आणखी जलद होऊन लोकल फेऱ्यांमध्ये लवकरच वाढ होणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील उशिरा धावणाऱ्या गाड्यांचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आता कार्यालयात वेळेवर पोहोचता येणार आहे. त्यामुळे लेटमार्कमधून सुटका होणार आहे.
