गणरायाचं दर्शन घेऊन घरी परतत असताना अपघात; खड्डेमय रस्त्यावर आई- मुलाचा अंत

मुलीच्या घरून दुचाकीवरून परतणाऱ्या आई आणि मुलाचा अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी मुंबई-नाशिक महामार्गावरील माणकोली नाक्याजवळ घडली. मुंबई-नाशिक महामार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरश: चाळणी झाली आहे. येथील प्रवास धोक्याचा झाला आहे.

खड्डेमय रस्त्यावर दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असून त्यातून मार्ग काढताना दुचाकीचालक जागा मिळेल तिथून पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र अनेकदा रस्त्यातील खड्डे त्यांच्या जिवावर बेतत आहेत. गुरुवारी झालेला अपघातही खड्ड्यांमुळेच झाल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. मात्र पोलिसांनी हा अपघात खड्ड्यामुळे झाला नसल्याचे म्हटले आहे. भिवंडीमधील आंबेपाडा गावात राहणाऱ्या देवीबाई बाळाराम काकडे (४८) या मुलगा नितीन बाळाराम काकडे (२६) याच्या दुचाकीवरून पूर्णा गावात राहणाऱ्या आपल्या मुलीच्या घरी गेल्या होत्या. गणरायाचे दर्शन घेऊन घरी परतत असताना त्यांची दुचाकी माणकोली नाक्याजवळ घसरली. त्याचवेळी मागून आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेने काकडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान, या प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरोधात नारपोली पोलिस ठाण्यात अपघात आणि हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *