देशातील उत्तरेकडे असणाऱ्या अनेक राज्यांमध्ये सोमवारपासूनच काहीशा वेगळ्याच वातावरणाची नोंद केली जात आहे. या राज्यांच्या मैदानी भागांमध्ये ढगाळ वातावरण आणि पावसाची नोंद केली जात आहे. तर, पर्वतीय भागांमध्ये तापमानाच कमालीची घट झाली असून, बहुतांश ठिकाणी बर्फवृष्टीही झाली आहे. मोठया प्रमामात बर्फवृष्टी झाल्यामुळं जम्मू काश्मीर येथील जम्मू – श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग आणि मुघल रोड बंद झाले. परिणामी सलग दुसऱ्या दुवशी काश्मीरचा देशाच्या इतर भागांशी असणारा संपर्क तुटला.
तिथं काश्मीरचा पारा सातत्यानं खाली जात असतानाच राजधानी दिल्लीवर मात्र पावसाचा शिडकावा सुरु आहे. यातच भर म्हणजे इथं काही भागांत गारपीटही पाहायला मिळाली. हवामान खात्याच्या माहितीनुसार सलग तिसऱ्या दिवशी दिल्लीत अवकाळी पाऊस झाला. ज्याचे थेट परिणाम तेथील तापमानावर दिसून आले.
मुंबईसह महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. याचा थेट परिणाम इथल्या तापमानावर आणि शेती व्यवसायावर झाला. पुढील काही दिवसांसाठीही इथं अशाच प्रकारच्या वातावरणाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टीवर द्रोणीय स्थितीचा (ट्रफ) परिणाम आगामी ३ दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे. हवामानात सातत्यानं होणाऱ्या या बदलांमुळं नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन संबंधित प्रशासकिय यंत्रणांकडून करण्यात येत आहे.

