महाराष्ट्रात सफरचंद लागवड!

महाराष्ट्रात सफरचंद लागवड!

नगर जिल्ह्यतील आश्वी (ता.राहाता) येथील बाबासाहेब गायकवाड यांनी एक गुंठा जमिनीत सफरचंद लागवड केली आहे. गायकवाड हे ‘एमएस्सी अ‍ॅग्री’ असून ते येवले येथील कृषी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. ते या लागवड प्रयोगाच्या शोधात होते. याचवेळी त्यांना दिंडोरी (जि. नाशिक) येथे देखील एका शेतक ऱ्याने सफरचंदाची लागवड केल्याचे समजले. या शेतीसाठी दहेगाव (ता. वैजापूर) कृषी महाविद्यालयातील डॉ. विनायक शिंदे यांनी मार्गदर्शन केल्याचे गायकवाड यांना समजले. ही माहिती मिळताच गायकवाड हे त्यांच्या कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनेश कुलधर आणि डॉ. शिंदे यांच्याबरोबर संबंधित शेती पाहण्यास गेले. यातून त्यांना नाशिकच्या तापमानात सफरचंद लागवड यशस्वी होते हे समजले. येथील झाडाला फळेही आलेली होती. एका झाडाला प्रारंभी दोन किलो फळे लागलेली होती. हे पाहून आल्यावर आता गायकवाड यांनी एक एकर जमिनीवर ते लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे.

संपूर्ण आशियात भारत हा विविध ऋतूंनी नटलेला निसर्गरम्य वातावरण लाभलेला देश आहे. प्रत्येक राज्यानुसार व वातावरणानुसार शेती पद्धतीत थोडाफार फरक जाणवतो. थोडा फरक सोडला तर बाकी सर्वत्र काही एकसारखी पिके घेतली जातात. पण पिकांमध्ये त्या-त्या प्रदेशाचा एकछत्री अंमल असतो. त्यात सफरचंद हे अग्रस्थानी आहे. सफरचंद म्हटले, की जम्मू काश्मीर हे नाव अग्रस्थानी आहे. पण आता ‘हर्मन ९९’ या वाणामुळे ही ओळख पुसेल असे वाटू लागले आहे. आगामी पाच वर्षांत जर ही लागवड यशस्वी झाली तर महाराष्ट्र सफरचंद फळात आघाडी घेईल असे वाटते. या फळाला लागवडीसाठी चिकट तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन उपयुक्त ठरते. सफरचंदाची लागवड करण्यासाठी तापमान सरासरी २१ ते २४ अंश असणे गरजेचे आहे. हे तापमान वर्षांतून किमान २०० तास झाडाला मिळायला हवे. पण आपल्याकडे राज्यात असे तापमान थंडीतच दोनशे पेक्षाही जास्त तास मिळते. त्यामुळे तापमानाचा प्रश्न निकाली निघाला आहे, असे लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पिकाला चांगली फुले आणि फळ धारणा होण्यासाठी सुमारे १०० ते १२५ सेंटीमीटर पर्जन्यमान असणे आवश्यक आहे. ते पर्जन्यमान राज्यात उपलब्ध आहे.

सफरचंद या फळाची रोपे कलम करून तयार केली जातात. याची लागवड साधारण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये केली जाते. ही कलम केलेली रोपे बिलासपूर येथून आणली जातात. अन्य भागातही नर्सरीत ही रोपे मिळतात. गायकवाड यांनी सफरचंद झाडाची नर्सरी सुरू केली असून ते शेतकऱ्यांना रोपे उपलब्ध करून देतात. एक एकर जमिनीत ५०० झाडांची संख्या असते. लागवड करतांना रासायनिक खतांबरोबर या झाडाला प्रति वर्षी १० किलो शेणखत द्यावे लागते. रासायनिक खतांची मात्रा मातीच्या परीक्षणावर अवलंबून असते, तरीही साधारण ३५० ग्रॅम नत्र, १७५ ग्रॅम स्फुरद आणि ३५० ग्रॅम पालाश पूर्ण वाढलेल्या झाडाला दिले जाते. उन्हाळ्यामध्ये झाडाला ७ ते १० दिवसाच्या अंतराने पाण्याची गरज भासते. फळ धारणा झाली की साधारणपणे आठवडय़ाने झाडाला पाणी दिले जाते. वेगवेगळ्या हंगामानुसार या फळावर विविध रोग आणि किडींचा प्रादुर्भाव आढळतो. या पिकावर कोलार रॉट, अँपल स्कॅब यासारखे रोग पडतात, या वर मॅनको झेब, कार्बेन्डाझिम तसेच इतर बुरशी नाशकांची फवारणी योग्य पद्धतीने घेऊ न रोग नियंत्रण करता येते.

नाशिक व पुणे जिल्ह्यत अशी यशस्वी लागवड झाली आहे. शिरुर तालुक्यातील मुखई येथील अभिजित प्रल्हाद धुमाळ या युवा शेतकऱ्याने सफरचंदाची यशस्वी लागवड करून दाखवली. दोन वर्षांपूर्वी लागवड केलेल्या ‘हर्मन—९९’ या जातीच्या सफरचंदाला सध्या तिसऱ्याच वर्षी चांगली फळे लागली आहेत. २०१७ मध्ये त्यांनी सफरचंद शेतीबाबत माहिती काढली आणि थेट काश्मीरमधील शेतकऱ्यांना संपर्क करून बरीचशी माहिती जमा केली. विविध माध्यमातून माहिती जमा केल्यांनतर त्यांनी ‘हर्मन-९९’ हा सफरचंदाचा वाण लागवडीसाठी निवडला. त्यांना मिळालेल्या यशाने व अनुभवाने नक्कीच अन्य भागातील शेतकऱ्यांनाही त्यांच्या अनुभवाचा फायदा होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *