दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरपासून वाशीच्या घाऊक बाजारात कोकणातून हापूस आंब्याच्या मुहूर्ताच्या पेट्या यायला सुरुवात होते. त्यानंतर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून हापूस आंब्याचा हंगाम सुरू होतो. फेब्रुवारी ते मार्च आणि एप्रिल ते मे हे हापूस आंब्याचे दोन मुख्य हंगाम मानले जातात. हंगामाच्या सुरुवातीला आंब्याच्या ५ ते ६ गाड्या दररोज येतात. मात्र मुख्य हंगामात फक्त आंब्याच्या १०० ते २०० गाड्या बाजारात येतात. एका दिवसाला आंब्याच्या सुमारे एक लाख पेट्या बाजारात येतात. एका दिवसाला एक लाख पेट्या येणे म्हणजे हंगाम चांगला मानला जातो. मुंबई घाऊक बाजार हा आंब्यांसाठी देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखला जातो.
मात्र यावर्षी ही परिस्थिती असणार की नाही याबाबत व्यापारी साशंक आहेत. काजू-आंब्याची जुनी झाडे मुळापासून कोसळली आहेत. झाडे पूर्वीसारखी उभी राहण्यासाठी वेळ लागेल. आंब्याची झाडेच नाहीत, तर आंबे येणार कुठून? असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. यामुळे यावर्षी आंब्यांचे उत्पादन ४० टक्के कमी होण्याची दाट शक्यता आहे.
यावर्षी कोकण किनारपट्टीवर आलेल्या चक्रीवादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात नारळ, पोफळीच्या बागांबरोबरच काजू आणि आंब्याच्या झाडांचेही नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत. तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या मोडून गेल्या आहेत. झाडेच कमी असल्याने यावर्षी आंब्याचे उत्पादनही कमीच असणार असल्याचे कोकणातील आंबा उत्पादक सांगत आहेत. त्यामुळे मुंबईच्या बाजारात यावर्षी कोकणातील हापूस कमी प्रमाणात पाहायला मिळणार आहे.

