माहीमच्या खाडीत पांढरा थर, पर्यावरणवादी चिंतेत

माहीमच्या खाडीत किनाऱ्यालगत पाण्यावर पांढरा थर साचला असून त्यात दिवसेंदिवस भर पडत चालल्याने पर्यावरणवादी आणि जागरूक नागरिकांनी चिंता व्यक्त केली आहे. कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे हा थर निर्माण होत असावा असे तज्ज्ञांचे मत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची गंभीर दखल घ्यायला हवी अशी मागणीही होऊ लागली आहे.

हार्बर मार्गावरील माहीम रेल्वे स्थानकाहून वांद्र्याला जात असताना एका प्रवाशाने आपल्या मोबाइल फोनद्वारे या थराचा फोटो काढला.

ज्या अर्थी खाडीतील किनारपट्टीवर हा पांढरा थर जमा होतो, त्या अर्थी तो विशिष्ट ठिकाणाहून येत असावा. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने याचा शोध घेण्याची गरज आहे, असे सुमायरा अब्दुलली या पर्यावरण कार्यकर्तीचे म्हणणे आहे. अशाच प्रकारचा थर आपण किहीम खाडीतही पाहिला असल्याचे तिचे म्हणणे आहे.

माहीम खाडीत अनेक कारखान्यांचे सांडपाणी सोडले जात असते अशी माहिती पर्यावरणवादी डी. स्टॅलीन यांनी दिली आहे. यामुळे किनारपट्टीला धोका निर्माण झाला असल्याचेही ते म्हणाले. धारावी परिसरात असलेल्या अनेक कारखान्यांमधून रसायनयुक्त सांडपाणी माहीमच्या खाडीत सोडले जाते आणि याची प्रदूषण मंडळाने दखल घेतली पाहिजे अशी मागणी स्टॅलीन यांनी केली आहे.

मात्र, माहीमच्या खाडीत पांढरे थर दिसण्याबाबतची तक्रार प्रदूषण मंडळाकडे आलेली नसल्याचे मंडळाचे संचालक (पाण्याचा दर्जा) वाय. बी. सोनटक्के यांनी म्हटले आहे. जर हे सांडपाणी एखाद्या कारखान्यामधून येत असेल, तर तो नेमका कारखान कोणता आहे याची तपासणी केली पाहिजे. भरतीच्या वेळी खोल समुद्रातील हा थर किनारपट्टीवर आला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही असेही सोनटक्के म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *