ऑगस्टमधील पावसाची यंदा जास्त नोंद

जुलै महिन्यात बरसलेल्या संततधार पावसामुळे मुंबई, ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारी धरणे भरल्यानंतर मात्र पावसाने काहीशी विश्रांती घेतली आहे. तरीही मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस झाला आहे. मागील वर्षी ११ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात १२ हजार ४३३ मिमी पावसाची नोंद झाली होती. ती यंदा १३ हजार ८५४ मिमी इतकी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यंदा सरासरीच्या सर्वाधिक ९०.७२ टक्के पाऊस ठाणे तालुक्यात झाला आहे. त्याखालोखाल भिवंडी (८९.६०), उल्हासनगर (८५.६७), कल्याण (८३.८८), अंबरनाथ (८०.९१), शहापूर (६६.७६) टक्के पाऊस झाला आहे. सरासरीच्या सर्वात कमी पाऊस मुरबाड तालुक्यात नोंदवण्यात आला असून, तेथील पावसाचे प्रमाण ६६.७६ टक्के इतके आहे.

सप्टेंबरअखेरीस दमदार पाऊस कायम राहिल्यास पुढील वर्षी मुंबई-ठाण्यात पाणीकपातीची वेळ येणार नाही. मात्र, जिल्ह्यातील वाढती लोकसंख्या व शहरांमध्ये पाण्याचा बेपर्वाईने केला जाणारा वापर पाहता डिसेंबरच्या प्रारंभीच दरवर्षी लघुपाटबंधारे विभाग ठाणे जिल्ह्यात पाणीकपातीचा निर्णय जाहीर करते. ऐन मे महिन्यात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदाही खबरदारीचा उपाय म्हणून त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *