पैठणजवळच्या कालव्यात बैलगाडी बुडाली, दोन बैलांचा मृत्यू

पैठण येथील जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यावरील अरुंद रस्त्यावर जात असणारी एक बैलगाडी तोल गेल्याने कालव्यात पडली. या दुर्घटनेत दोन बैलांचा मृत्यू झाला. ही घटना पैठण तालुक्यातील नवगाव शिवारात मंगळवारी दुपारी घडली. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील वृद्धेश्वर सहकारी कारखान्यात काम करणाऱ्या उसतोड कामगाराची ही बैलजोडी होती. तुळजापूरचे मुकादम सोमनाथ दगडखैर यांच्याकडे गंगाराम भाकरे हे उसतोड कामगार म्हणून काम करतात.

रामनगर येथील ऊस उत्पादक शेतकरी रंजना रावसाहेब दहिफळे यांच्या शेतात ऊस तोड सुरु होती.आज दुपारी कॅनलवर ऊसाचा ट्रॅक्टर भरत असतांना अरुंद रस्त्यांवरुन जात असलेल्या बैलगाडीचा अचानक तोल गेल्याने पाणी वाहत असलेल्या कॅनलमध्ये पडली.बैलगाडी पडताच काही क्षणात आजूबाजूला असलेले शेतकरी, ऊसतोड मजूर धावले. शर्थीचे प्रयत्न करुन एक बैल बाहेर काढण्यात आला परंतु तो मरण पावला तर दुसरा बैल वाहुन गेला. उचल घेऊन ऊसतोड करणारे कामगार गंगाराम ञिंबक भाकरे यांचे अंदाजे ६० हजार रुपये किंमतीचे बैल मरण पावल्याने त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून कारखान्याने त्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *