विवाहितेचा पैशांसाठी छळ

कोणत्या ना कोणत्या कारणावरून तसेच माहेरून पैसे आणण्यासाठी मारहाण करत महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळी अशा एकूण पाच जणांविरुद्ध शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिलेच्या पतीने २०१६ मध्ये रजिस्टर पोस्टाने शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर तीन तलाकही दिला होता.

पीडित २० वर्षीय युवतीचा विवाह दोन वर्षांपूर्वी भिवंडीतील एका मुलासोबत झाला होता. विवाह सोहळा गावी पार पडला होता. लग्नात युवतीच्या वडिलाने सोन्याचे दागिने दिले होते. लग्नानंतर युवती भिवंडीत नागांव रोडवर असलेल्या पतीच्या घरी राहण्यास आली. मात्र लग्नानंतर पती तिला पैशासाठी तगादा लावू लागला. लग्नात दिलेली गाडी पसंत नसल्याने दुसरी बाइक घेऊन किंवा तुझ्या वडिलांकडून ५० हजार रुपये घेऊन ये असा तगादा लावत होता. तसेच शिविगाळ करायचा. तिच्याकडे अन्य वस्तूंची मागणी करण्यात आली. मात्र युवतीने मागणी पूर्ण न केल्याने तिला त्रास देण्यास सुरुवात केली. काही ना काही कारणावरून पती तिला हिणवू लागला. तसेच पतीसह सासरची मंडळीही तिला त्रास देऊ लागले. मारहाणही करत होते. सासरच्या सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासामुळे युवती वैतागली होती. अखेर ती आपल्या भिवंडीतीलच माहेरी गेली. मात्र १५ सप्टेंबर २०१६रोजी पतीने तिला तलाकनामाच पाठवला. त्यानंतर युवतीने महिला तक्रार निवारण कक्षात धाव घेत तिने आपली व्यथा सांगितली. मात्र सासरच्या मंडळींना वारंवार बोलवल्यानंतरही कोणीच आले नाही. अखेर या युवतीने शारीरिक आणि मानसिक छळाबद्दल पोलिस ठाण्यात धाव घेत पती, सासू, सासरा, दिर, भावजय यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *