लग्नातील जेवणातून दहा जणांना विषबाधा

देहूरोड परिसरातील किवळे येथील एका लग्न समारंभातील जेवणातून विषबाधा झाल्याची घटना रविवारी घडली. यातील १० जणांवर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. रूग्णांमध्ये तीन महिला, तीन मुले आणि चार पुरुषांचा समावेश आहे. यापैकी एका महिलेची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किवळे येथील धर्मराज मंगल कार्यालयात कांबळे आणि बनसोडे कुटुंबीयांमध्ये रविवार लग्नकार्य होते. समारंभातील जेवणानंतर काही पाहुणे मंडळींना जुलाब आणि उलट्याचा त्रास सुरू झाला. यात १० जणांचा समावेश होता. ही विषबाधा बासुंदीमधून झाल्याचा प्राथमिक अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. इतरांची प्रकृती स्थिर आहे. ही विषबाधा केवळ शेवटच्या पंगतीत जेवणाऱ्या मंडळींना झाल्याचे समोर आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *