एकाचे पैसे दुसऱ्याच्या खात्यावर

ऑनलाइन व्यवहारांत अनेक ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी सायबर क्राइमकडे येत असतात. त्यातच फक्त भारतीय स्टेट बँकेच्याच ग्राहकांचे पैसै दुसऱ्या खात्यावर वळते झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यामुळे सरकारी बँकांतील ग्राहकांच्या खात्यांची सुरक्षाही ऐरणीवर आली आहे. सदर प्रकार बँकेच्या क्लार्कच्या चुकीने घडल्याचे समोर आले.

मूळचे उत्तर प्रदेशातील असलेले संजय पासी सातपूरच्या अशोकनगर भागात टेलरिंगचा व्यवसाय करतात. पासी यांना लग्न समारंभासाठी गावाकडे जायचे असल्याने त्यांनी मंगळवारी बँकेतील शिल्लक तपासण्यासाठी एटीएम गाठले. बँक स्टेटमेंट पाहिल्यानंतर त्यांच्या खात्यातील वीस हजार रुपये एका खासगी फायनन्स कंपनीच्या खात्यात वर्ग झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी थेट स्टेट बँकेत धाव घेत खात्यातून पैसै अचानक दुसरीकडे गेल्याचे बँक

अधिकाऱ्यांना सांगितले. यावेळी बँक अधिकाऱ्यांनी संबंधित क्लार्कला याबाबत विचारणा केली. यात क्लार्कने कबुली देत ग्राहकाचे पैसै दुसरीकडे वर्ग झाले असून, ४८ तासांच्या आता पुन्हा त्यांच्या खात्यावर जमा केले जातील, असे सांगितले. दरम्यान केंद्र व राज्य सरकारने बँकेत खाते उघडणे अनिवार्य केले आहे. परंतु, ग्राहकांच्या पैशांची सुरक्षा स्टेट बँकेचे अधिकारी कर्मचारी घेत नसतील तर त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे. हजारो ग्राहकांच्या खात्यांची सुरक्षा यामुळे ऐरणीवर आली आहे. स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच याकडे लक्ष घालावे अशी मागणी होत आहे.

खात्यातील शिल्लक चेक करण्यासाठी एटीएममध्ये गेलो. यावेळी खात्यातून २० हजार रुपये दुसऱ्या खात्यावर वळते झाल्याचे लक्षात आले. यानंतर बँकेत गेल्यावर संबंधित क्लार्कने ४८ तासांच्या आत पैसे पुन्हा खात्यात जमा करू असे सांगितले.
– संजय पासी, स्टेट बँक ग्राहक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *