तीन वर्षांपूर्वी आजोबांसोबत मुंबईला गेल्यावर तेथे बेपत्ता झालेल्या आठ वर्षांच्या मुलीचा शोध लागला असून मुंबई पोलिसांनी तिला तिच्या आईवडिलांच्या हवाली केले आहे. या मुलीच्या शरीरावर शस्त्रक्रियेच्या काही खुणा दिसून आल्या असल्या तरी कशासाठी आणि कुणी तिच्यावर शस्त्रक्रिया केली, हे मात्र गुलदस्त्यातच आहे.
यासंबंधी माहिती अशी की, नेर तालुक्यातील आजंती येथील एक मुलगी पाच वर्षांची असताना आजोबांसोबत मुंबईला तीन वर्षांपूर्वी गेली आणि मुंबईत ती बेपत्ता झाली. ती आता सापडली असली तरी तिच्या शरिरातील काही अवयव काढून त्यांची तस्करी झाली असावी, असा संशय तिच्या शरीरावरील शस्त्रक्रियेच्या खुणांवरून व्यक्त केला जात आहे. या मुलीची वैद्यकीय तपासणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा बालकल्याण समितीने वैद्यकीय महाविद्यालयास दिल्याचे समजते. मात्र, महाविद्यालयांकडून कोणताही अहवाल समितीला प्राप्त झालेला नाही. मुलगी आणि तिचे पालक अठराविश्व दारिद्रय़ात राहणारे असल्याने त्यांच्या दुर्देवाला कोणी वाणी नसल्याचे चित्र असले तरी मुलगी मिळाली, हा आनंद अमूल्य असल्याची त्यांची भावना आहे.