नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागावी – काँग्रेस

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या गोव्यातील वक्तव्याचा मी निषेध करतो. रांगेत उभ्या असलेल्या लोकांचा त्यांनी अपमान केला. त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी बुधवारी राज्यसभेत केली.
५०० आणि १ हजार रुपयाच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयावरुन त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी तुम्ही कोणाचे ऐकत नाही. निर्णय घेता, जाहीर करता. सर्वसामान्य माणसाला भोगावे लागते असे आनंद शर्मा म्हणाले.
आनंद शर्मा यांच्या भाषणातील मुद्दे
 – ८६ टक्के चलन ५०० आणि १ हजार रुपयांमध्ये होते, एका घोषणेने हे सर्व चलन रद्द झाले, हा सर्व काळा पैसा होता का ?
– स्टेट बँक ऑफ इंडियाचा अहवाल आहे, ५०० आणि १ हजारच्या नोटा बदलणार हे तीन ते चार महिने आधीपासूनच माहित होते, मग पर्यायी व्यवस्था का नाही केली ?
– सरकार प्रश्न विचारणा-याला राष्ट्रभक्तीच्या निकषामध्ये बसवले जाते, अशा प्रकारचे वातावरण या सरकारने निर्माण केले आहे.
– तुम्ही कोणाचे ऐकत नाहीत, निर्णय घेऊन जाहीर करता आणि सर्वसामान्य माणसाला पालन करायला सांगता.
– काळा पैसा मालमत्ता खरेदी, सोन्या-चांदीमध्ये आहे लोकांच्या कपाटात, बॅगेमध्ये नाही.
– तुम्ही उद्योगपतींच्या कर्जाची पूर्नरचना केली, शेतक-यांची कर्जे माफ केली ?.
– आंतरराष्ट्रीय करारांमुळे परदेशी बँकांमध्ये कोणाचे किती पैसे आहेत हे तुम्हाला ठाऊक आहे, तुम्ही त्यांची नावे जाहीर करा.
लोकांना त्यांचे पैसे बँकेतून काढण्यावर कुठल्या कायद्याच्या आधारे तुम्ही निर्बंध घातले.
– आपला नागरी देश आहे, इथे नियम चालतात आणि तुम्ही सर्व नागरीकांना गुन्हेगार बनवलं.
– गरीबाना फटका बसतोय, शेतक-यांकडे क्रेडीट कार्ड आहे ?.
– भारतात जाण्याआधी विचार करा असा सल्ला परदेशी दूतावास आपल्या नागरीकांना  देत आहेत.
– पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे भारताची अर्थव्यवस्था काळया पैशावर चालते हा संदेश संपूर्ण जगामध्ये गेला.
– भारताच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्वपूर्ण योगदान आहे, या शेतक-यामुळे आपल्याला कोणासमोर हात पसरावे लागत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *