वातप्रकोप टाळण्यासाठी..

  • शक्यतो उकळून गार केलेलेच पाणी प्यावे.
  • आहारात जुने धान्य खावे. विशेषत: नवीन तांदूळ टाळावा. त्याने त्रास होऊ शकतो.
  • स्वयंपाकाच्या नेहमीच्या फोडणीत या दिवसांत सुंठ वापरता येईल किंवा कधीतरी भाज्यांना तूप-सुंठीची फोडणी द्यावी.
  • पिंपळी, पिंपळीमूळ, चित्रक नावाच्या एका उष्ण वनस्पतीची मुळे ही द्रव्ये मसाल्याचे पदार्थ म्हणून वापरतात. त्यांचा स्वयंपाकात उपयोग करावा. सौवर्चल मीठ नावाचे एक प्रकारचे खनिज मीठ असते. तेही या दिवसांत वापरता येते. परंतु ते सहज उपलब्ध होत नसल्यामुळे त्याऐवजी सैंधव मीठ वापरून चालू शकेल.
  • आपला परिसर नेहमी कोरडा राहील याकडे लक्ष द्यावे. बुरशी टाळण्यासाठी ते गरजेचे आहेच, परंतु पावसाळ्यात डासांपासून पसरणाऱ्या विषाणूजन्य तापांचा प्रादुर्भाव अधिक असतो. डासांची पैदास होऊ नये यासाठी पावसाचे पाणी साठू न देणे महत्त्वाचे.
  • अंगावर घालायचे कपडेही कोरडेच असावेत. आयुर्वेदात याबाबत धुरी दिलेले कपडे घालावेत असा उल्लेख सापडतो.
  • या दिवसांत अति व्यायाम नको. अति चालणेही नको.
  • आहार तीळ, जवस, कारळे या तेलबियांचा जरूर वापर करावा. त्याची चटणी करून रोजच्या जेवणात समाविष्ट करता येईल.
  • ओले खोबरे आहारात असू द्यावे.
  • पावसाळ्यात आंबट पदार्थ खावेत. सलग पाऊस लागून राहिलेला असताना ‘आम्ललवण’ भोजन घ्यावे असाही उल्लेख सापडतो. पावसाळ्यात मिळणारी ताजी, आंबट फळे किंचित मीठ लावून खावीत. ताकही जरूर प्यावे.
  • या दिवसांत शिळे अन्न नको. कडक उपवासही नकोत.
  • हरभऱ्यासारखी द्विदल धान्ये शक्यतो टाळावीत. त्यांनी वात वाढतो.
  • मधाचे सेवन करावे. विशेषत: दम्याचा त्रास असलेल्यांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो.
  • अति श्रम टाळावेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *