उरीमधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात आतापर्यंत भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. ३ जवानांचं उपचारांदरम्यान निधन झाल्यामुळे हा आकडा २० वर पोहचला आहे.
तीनही शहीद जवानांचं पार्थिव सुरूवातीला पुण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
महाराष्ट्राच्या तीन वीर जवानांचा यात समावेश आहे. लान्स नायक जी शंकर साताऱ्याच्या जाशी गावचे, तर टी. एस. सोमनाथ नाशिकच्या खंडनगळीचे, यूके जानराव अमरावतीच्या नांदगावचे रहिवाशी होते.
उरी येथील लष्करी तळाला रविवारी दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात १७ जवान शहीद झाले तर ३० जण जखमी झाले. त्यातील काहींची प्रकृती गंभीर असून सर्व जखमींना श्रीनगरमधील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज सकाळी उपचारादरम्यान तीन जवानांचा मृत्यू झाला.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून अवघ्या काही किमी अंतरावर असलेल्या उरी येथे लष्कराचा तळ आहे. या तळावर रविवारी पहाटे जैशच्या चार दहशतवाद्यांनी हल्ला केला. बेछूट गोळीबार आणि ग्रेनेडचा वापर करत दहशतवाद्यांनी हा हल्ला केला. ग्रेनेड हल्ल्यामुळे तळावरील तंबूंना आगी लागल्या व क्षणार्धात ही आग संपूर्ण बराकीत पसरली. लष्कराने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चारही दहशतवादी ठार झाले. तब्बल तीन तास ही चकमक चालली होती.
व्यर्थ न हो बलिदान ; उरी हल्ल्यातील शहीद जवान
१) सुभेदार कर्नल सिंग – जम्मू काश्मीर
२) हवालदार रवी पॉल – जम्मू काश्मीर
३) शिपाई राकेश सिंग – बिहार
४) शिपाई जावरा मुंडा – झारखंड
५) शिपाई नैमन कुजूर – झारखंड
६) शिपाई उईके – अमरावती, महाराष्ट्र
७) हवालदार एन. एस. रावत – राजस्थान
८) शिपाई गणेश शंकर – उत्तर प्रदेश
९) नायक एसके विद्यार्थी – बिहार
१०) शिपाई बिस्वजीत घोराई – पश्चिम बंगाल
११) लान्स नायक चंद्रकांत शंकर गलांडे – जाशी, सातारा
१२) शिपाई जी दलाई – पश्चिम बंगाल
१३) लान्स नायक आर के यादव – उत्तर प्रदेश
१४) शिपाई हरिंदर यादव – उत्तर प्रदेश
१५) शिपाई संदीप सोमनाथ ठोक – खंडनगळी, नाशिक
१६) हवालदार अशोक कुमार सिंग – बिहार
१७) शिपाई राजेश सिंग – उत्तर प्रदेश