यंदाच्या वर्षी मॉन्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडणार असल्याचा अंदाज भारतातील खासगी वेधशाळा “स्कायमेट‘ने वर्तविला आहे. हा अंदाज खरा ठरल्यास सलग दोन वर्षे पडलेला दुष्काळ संपण्याची चिन्हे आहेत.
गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर महिन्यांमध्ये मॉन्सूनचा पाऊस सरासरीच्या फक्त 70 टक्केच पडला होता. त्यामुळे फक्त 50 टक्के शेतजमिनीलाच पाणी मिळाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. या वेळी मात्र चांगला पाऊस होण्याचा अंदाज असल्याचे “स्कायमेट‘ने म्हटले आहे. एल निनोच्या प्रभावामुळे मे महिन्याच्या अखेरीस केरळच्या किनाऱ्यावर मॉन्सून धडकून भारतात पावसाला सुरवात होण्याची शक्यता आहे. “स्कायमेट‘च्या अंदाजानुसार, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अणि मध्य भारतात चांगला पाऊस होऊन शेतकरी आणि सरकारला दिलासा मिळणार आहे. या अंदाजानुसार, सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्यास धान्योत्पादनात वाढ होऊन शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषीचा वाटा 14 टक्के आहे. भारतीय वेधशाळेचा मॉन्सूनबाबतचा अंदाजही लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
‘स्कायमेट‘चा पावसाचा अंदाज
105 टक्के : दीर्घकालीन सरासरीपेक्षा अधिक
35 टक्के : वार्षिक सरासरीपेक्षा अधिक