मुंबईची बहुचर्चित एसी लोकल अखेर मुंबईत दाखल झालीये. मध्य रेल्वच्या कुर्ला येथील कारशेडमध्ये ही लोकल दाखल झालीये. सोमवारी रात्री उशिरा ही लोकल मुंबईत झाली तर खिडकीची काच फुटल्याचे दिसून येत आहे.
मुंबईचा उन्हाळा आणि त्यात मुंबईकरांना करावा लागणारा रेल्वेचा प्रवास काही प्रमाणात का होईना सुखकर व्हावा, अशी मुंबईकरांची इच्छा होती. गेल्या अनेक वर्षांच्या रेल्वे अर्थसंकल्पात मुंबईत एसी लोकल धावेल असं वचन मुंबईकरांना दिलं जात होतं. अखेर या वचनाची काही प्रमाणात तरी पूर्तता झाल्याचं वाटतंय.
आधी मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावर धावणारी लोकल आता मात्र पहिल्यांदा ट्रान्स हार्बर मार्गावर धावणार असल्याचं निश्चित झालंय. तसे रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी ट्विट केले. १६ एप्रिलला म्हणजे ज्या दिवशी पहिली मुंबई ते ठाणे अशी रेल्वे भारतात धावली त्याच दिवशी या एसी लोकलची मुंबईत चाचणीला सुरुवात होत आहे.
चेन्नईच्या कारशेडमध्ये तयार होऊन ही लोकल मुंबईत दाखल होताना तिच्यावर दगडफेक झाली असण्याची शक्यता आहे. कारण, या लोकलच्या डब्याची एक काच फुटली असल्याचे आता पुढे आले आहे. त्यामुळे सरकारने दिलेल्या सुविधा नागरिक जबाबदारीने वापरणार का, असा प्रश्न पुढे आला आहे.
