होळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे बुधवार २३ मार्च रोजी ‘छायाकल्प चंद्रग्रहण’ होणार असून ते मुंबईसह संपूर्ण भारतातून दिसणार आहे.
छायाकल्प चंद्रग्रहणात चंद्र पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणा-या विरळ छायेतून जातो. अशावेळी पौर्णिमेचा नेहमी तेजस्वी दिसणारा चंद्र कमी तेजस्वी दिसतो, अशी माहिती खगोल अभ्यासक, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
बुधवार २३ मार्च रोजी दुपारी ३ वाजून ७ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेत येण्यास प्रारंभ होईल. परंतु त्यावेळी चंद्र आपल्या दृश्य आकाशात असणार नाही. सायंकाळी ७ वाजून २५ मिनिटांनी चंद्र पृथ्वीच्या विरळ छायेतून बाहेर पडेल.
मुंबईत चंद्र सायंकाळी ६ वाजून ४८ मिनिटांनी ग्रहणातच उगवलेला दिसेल. संपूर्ण भारतात चंद्रोदयापासून सायंकाळी ७ वाजून २५ मिनिटांपर्यंत हे छायाकल्प चंद्रग्रहण दिसेल.
छायाकल्प चंद्रग्रहणाला ‘मांद्य चंद्रग्रहण’ असेही म्हणतात. अशा ग्रहणात ग्रहण विषयक कोणतेही धार्मिक नियम पाळायचे नसतात. त्यामुळे या दिवशी होळी पौर्णिमा नेहमीप्रमाणेच साजरी करता येईल, असे सोमण यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, दुष्काळग्रस्त परिस्थितीत पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्यामुळे होळी, धुळवड आणि रंगपंचमी सणाचा आनंद लुटताना सामाजिक भानही जपा, असे आवाहन सोमण यांनी केले आहे. पाण्याचा वापर न करता कोरडी होळी खेळा, रासायनिक रंगांचा वापर करू नका असेही त्यांनी सांगितले.