वेगमर्यादा मोडल्यास भरावा लागणार दंड

गुळगुळीत आणि कमी ट्रॅफिक असलेला रस्ता पाहिल्यानंतर गाडी सुसाट पळविण्याचा मोह कुणाला होणार नाही. पण सोलापूर – धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११वर जर निर्धारित वेगमर्यादा ओलांडली, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. या रस्त्यावर आता ठिकठिकाणी स्पीड गन तैनात करण्यात आल्या आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सोलापूर – धुळे हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग बांधला. पहिल्या टप्प्यात सोलापूर ते येडशी आणि दुसऱ्या टप्प्यात येडशी ते औरंगाबाद रस्त्याचे चौपदरीकरण, मजबुतीकरण, सर्व ठिकाणी बायपास, आवश्यक त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारले गेले. या प्रवासादरम्यान चार टोलनाके आहेत. रस्त्याचा दर्जा उत्तम दर्जाचा आहे. संपूर्ण प्रवासभर दुभाजक त्यात ट्रॅफिक कमी आणि गुळगुळीत रस्ता असल्याने गाड्यांचा वेग वाढत आहे. वाढत्या वेगामुळे अपघात होऊ नयेत, याची काळजी घेण्यासाठी महामार्ग सुरक्षा पोलिस, एनएचएआय, आरटीओ यांच्या समन्वयाने ठिकठिकाणी स्पीड गन तैनात केल्या आहेत. समोरुन येणाऱ्या गाडीला विशिष्ट टप्प्यात आल्यानंतर तिचा वेग मोजण्याची यंत्रणा या गनमध्ये आहे. मर्यादा ओलांडून जाणारी एखादी गाडी असेल, तर तिचा फोटो काढला जातो आणि संबंधित गाडी ज्याच्या नावावर आहे त्यांना दंडाची पावती पाठविली जाते. वेगावर नियंत्रण राहावे, अपघात होऊ नयेत, यासाठी ही यंत्रणा कार्यरत झाली आहे. नियमानुसार रस्त्यावर वेगमर्यादेचे फलक असणे आवश्यक आहे. चारपदरी रस्त्यासाठी ६० किलोमीटर प्रतितास वेगमर्यादा आहे. रस्त्यावर दुतर्फा कुठेही वेगमर्यादा नियंत्रणाचे फलक तूर्तास तरी लावण्यात आलेले नाहीत. वेगमर्यादा पालन करण्यासाठी वाहनधारकांच्या माहितीसाठी हे फलक तातडीने लावणे आवश्यक आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *